TOD Marathi

टिओडी मराठी, दिल्ली, दि. 21 जून 2021 – सध्या देशाला जाहिरातबाजीची नव्हे तर, कोरोना लसची आवश्यकता आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्राला सुनावलं आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोरोना विरोधी लस हाच आहे. अनेक देशांनी लसीकरणाला प्राधान्य देऊन देशाला ‘मास्क फ्री’ केलं आहे. बहुतेक देशांनी आपल्या देशात लस तयार केली आहे.

तर इतर देशांकडूनही विकत घेतली आणि देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं. जर केंद्र सरकारने ठरवलं तर संपूर्ण देशात वेगात लसीकरण होऊ शकतं. पण, आपल्या देशात कोरोना लसीचं संकट निर्माण झालं आहे, अशी टीका मनीष सिसोदिया यांनी केलीय.

पंतप्रधानांनी २१ जूनपासून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केलीय. जाहिरातबाजी केली पण, जून महिन्यात लसीचा साठा काही राज्यांना मिळालेला नाही. तर जुलै महिन्यामध्ये फक्त 15 लाख लसीचे डोस दिले जाणार आहेत.

यात कसं काम पूर्ण होईल? तुम्ही जगातील सर्वात मोठं कोरोना लसीकरण मोहिमेचा डंका पिटता पण, व्यवस्थापनाच्या पातळीवर शून्य कामगिरी दाखवता असं कसं चालेल?. केवळ जाहिरातबाजी देशाला नको, देशाला कोरोना विरोधी लसींची आवश्यकता नाही, असा हल्लाबोल मनीष सिसोदिया यांनी केला.

दिल्लीला २ कोटी ३० लाख कोरोना लसीचे डोसची गरज आहे. सध्याच्या वेगाने जर लसीकरण सुरू राहिलं तर आणखी १५ ते १६ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यापद्धतीने तर जगातील सर्वात नियोजन शून्य लसीकरण मोहीम म्हणून भारताच्या लसीकरण मोहिमेची ओळख निर्माण होणार आहे.

देशात कोरोना लसींचा साठा उपलब्ध नाही. पण, जाहिरातबाजी अधिक प्रमाणावर केली जातेय. जाहिरातबाजीवर खर्च केलेला पैसा जर लस उत्पादनासाठी खर्च केला असता तर सर्वांसाठी लसीचे डोस उपलब्ध झाले असते, असा टोला देखील सिसोदिया यांनी केंद्राला हाणला आहे.

दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांवर जाहिरातबाजी करण्यासाठीचा दबाव केंद्राकडून आणला जात आहे, असा आरोप ही सिसोदिया यांनी यावेळी केला. पुढील दोन महिने आम्हाला २ कोटी ३० लाख कोरोना लसीचे डोस द्या, आम्ही दोन महिन्यात संपूर्ण दिल्लीकरांचे लसीकरण पूर्ण करु. मग, मी स्वत: दिल्ली सरकारच्या वतीने केंद्राचे आभार व्यक्त करणारी जाहिरात प्रसिद्ध करेन, असेही सिसोदिया म्हणाले.