TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, येत्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये देशात पुन्हा कोरोना साथीचा तिसरी लाट येणार आहे आणि या लाटेला थांबवणे अशक्य आहे, असा दावा दिल्लीतील मोठी वैद्यकीय संस्था एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केला आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन पूर्णपणे हटवला आहे. त्यामुळे देशात पुन्हा कोरोना साथीचा तिसरी लाट येणार आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, प्रचंड लोकसंख्येचे लसीकरण करुन लोकांना कोरोनापासून सुरक्षित करणे हेच देशापुढे मुख्य आव्हान आहे. तसेच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे हा योग्य निर्णय आहे, कारण त्यामुळे अधिक लोकांचे जीव वाचवले जातील.

डॉ. रणदीप गुलेरिया पुढे म्हणाले, देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन उठवला आहे. परिस्थिती पुन्हा पूर्ववत केली आहे. मात्र, लोक अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताहेत, मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहित. लोक ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे वागत आहेत, त्यामुळे लोक पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतून काही शिकले नाहीत, असं समजतंय .

सामान्यत: नवीन लाटे यायला तीन महिने लागू शकतात. आपल्याला कोरोना प्रोटोकॉलशिवाय स्थितीवर काटेकोरपणे पाळत ठेवणे गरजेचे आहे. कारण, आधीच्या लाटेत आम्हाला कोरोनाचा एक नवीन प्रकार दिसला होता, जो परदेशातून आपल्या देशात आला आणि येथे विकसित झाला. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.