TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जून 2021 – भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षात विकास दर उणे (-) 7.3 टक्के नोंदवला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

मोदी सरकारचे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत आहेत, देशाचा विकासदर घसरला आहे, महागाईचा भडका उडाला आहे, त्यात मोदी सरकारने जनतेला हे रिटर्न गिफ्ट दिले आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलीय.

या दरम्यान, सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने मागील ४० वर्षातील सर्वात निराशाजनक कामगिरी केलीय. काही कारणांमुळे भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकासदर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे.

१९७९-८० या वर्षी आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला, अशी देखील माहिती जयंत पाटील यांनी दिलीय.