TOD Marathi

टिओडी मराठी, दि. २२ ऑगस्ट २०२१ – तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी मागील महिन्यात काही सूचना दिल्यात. त्यात १०० पैकी २३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था करावी, असे सांगितलं आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे, म्हणून अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, असं असलं तरी करोनाचं संकट काही टळलेलं नाही. करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने अगोदरपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केलीये. लसीकरण मोहीमेचा वेग वाढवला आहे. आतापर्यंत सहा लसींना परवानगी दिली आहे.

निती आयोगाने याअगोदरही सप्टेंबर २०२० मध्ये दुसर्‍या लाटेचा अंदाज बांधला होता. मात्र, आता बांधलेला अंदाज ठळक आहे, असे दिसत आहे. गंभीर आणि मध्यम लक्षणं असलेल्या सुमारे २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार आहे, असंही सांगितलं आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी आधारित पॅटर्नवर हॉस्पिटल बेड बाजूला ठेवण्याची शिफारस केली आहे. कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहणं आवश्यक आहे. एका दिवसात ४ ते ५ लाख करोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यामध्ये दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहीजेत.

यामध्ये व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड (त्यापैकी ५ लाख ऑक्सिजन बेड) आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड असावेत., अशा सूचना निती आयोगाने दिल्यात.

दुसर्‍या लाटेवळी म्हणजेच १ जूनला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख होती, तेव्हा २१.७४ टक्के रुग्णांना १० राज्यातील रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. यापैकी २.२ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये भरती केलं होतं.

सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या दुसर्‍या लाटेचा अंदाज काही महिन्यापूर्वी वर्तवला होता. तेव्हा १०० पैकी २० करोना रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा अंदाज बांधला होता. त्यापैकी तीन जणांना आयसीयूमध्ये भरती करावं लागेल. तसेच लक्षणं नसलेल्या ५० जणांना सात दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवावं लागेल.

उर्वरित करोना रुग्णांना घरी ठेवावं लागेल, अशा सूचना दिल्या होत्या. हा सर्व अंदाज करोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड रुग्णालयं व बेडच्या वापरावर आधारित होता.

पहिल्या लाटेदरम्यान १०० पैकी २० जणांना दाखल केलं होतं. त्यापैकी २.४३ लोकांना आयसीयूची गरज भासली होती. ८० जणांना विलगीकरणात ठेवलं होतं आणि त्यापैकी ५५ जणांना कोविड सेंटरमध्ये उपचार केले होते. आता दुसर्‍या लाटेनंतर अंदाजात सुधारणा केली आहे.