TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 28 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्यातील उद्योजकता वाढविण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यालाच अनुसरून सध्या करोना रुग्ण दर कमी होत असलेल्या १४ जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे.

दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यांत करोना सक्रिय रुग्णदर एक किंवा त्यापेक्षा कमी असेल तेथील करोना विषयक निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे, असे सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने निर्बंध शिथिलीकरणाचा प्रस्ताव सादर केलाय.

महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. याठिकाणी उद्योग- व्यापार याला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी निर्बंध शिथील केले जाणार आहेत.

एकीकडे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाला वाटत आहे. अशा जिल्ह्यांतील करोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशाप्रकारे करता येतील? याचा आढावा आरोग्य विभाग घेत आहे.

जुलै १८ ते २४ या कालावधीत सांगलीमधील सक्रिय करोना रुग्ण दर ९.१ इतका होता. त्यापाठोपाठ सातारा ८.२, सिंधुदुर्ग ८, पुणे ७.४ , कोल्हापूर ६.३, अहमदनगर ६.२,बीड ५.८ तर सोलापूर आणि रत्नागिरीमध्ये अनुक्रमे रुग्णवाढ दर हा ५ टक्के व ४.७ टक्के इतका आहे.

मुंबईत हाच दर २.३ टक्के असल्यामुळे लोकल ट्रेन सुरु करण्यासह अन्य निर्बंध शिथील करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावध आहेत, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

राज्याचा करोना रुग्णवाढ दर हा ४.५ टक्के आहे. करोनाच्या किमान निर्बंधांचे पालन केल्यास रुग्णवाढ आटोक्यात ठेवता येईल, असे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्यात चार कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. एक कोटीहून अधिक लोकांनी लसच्या दोन्ही मात्रा घेतल्यात. राज्य करोना कृती दलाचे डॉक्टर तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण होणे गरजेचं आहे.

मुंबईत ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय लोकल ट्रेनचा प्रवास सर्वांसाठी खुला करण्यास मुख्यमंत्री अनुकूल नाहीत. असे सूत्रांचे म्हणणे आहे. जूनमध्ये राज्याला केंद्राकडून १.१५ करोना लसीच्या मात्रा मिळाल्या होत्या. तर ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने १.२ कोटी लस मात्रा देण्याचे निर्देश दिलेत.

राज्यामध्ये सध्या ४००० हून अधिक केंद्रांमधून लस दिली जात आहे. दिवसाला १२ लाख लोकांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्याला लसीच्या पुरेशा मात्रा मिळाल्यास नियोजित वेळेपेक्षा कमी वेळात आम्ही लसीकरण पूर्ण करू शकतो, असे राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

यावर आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना जुलैच्या महिन्यात पत्र पाठवून दीड कोटी अतिरिक्त लसीच्या मात्रा देण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्राने ऑगस्ट महिन्यासाठी १ कोटी २० हजार लस मात्र दिली जाईल, असे सांगितले आहे.

यावर तिसऱ्या लाटेचा विचार करून १४ जिल्ह्यांसाठी करोना विषयक निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय.