TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 31 जुलै 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केलीय. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांची केलेली नियुक्त नियमबाह्य आहे. या नियुक्तीला आव्हान या याचिकेच्या माध्यमातून दिले आहे.

राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी केलेली नियुक्ती ही नियमांचे उल्लंघन आहे, असे शर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांत स्पष्ट केले आहे की, अशा सर्व प्रकारच्या नियुक्त्या सर्वप्रथम लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोटिफाय करायला हवं होतं.

तसेच कोणत्याही अधिकार्‍याच्या निवृत्तीसाठी 6 महिने शिल्लक असताना त्याची नियुक्ती डीजीपी किंवा त्या समान पदावर करता कामा नये, असे मनोहर लाल शर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिकेमध्ये नोंदवलेले आहे.

राकेश अस्थाना होणार होते निवृत्त –
राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी असून दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे पोलीस कमिश्नरपदी अस्थानांच्या नावाचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने काढला आहे, असे सांगितले जात आहे. अस्थाना हे बीएसएफचे डीजी म्हणून कार्यरत आहेत.

अस्थाना हे सुरतचे कमिश्नरही राहिलेे आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये आसाराम बापू प्रकरणाचा उलगडा झाला होता. त्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणही अस्थाना यांच्या मार्गदर्शनाखाली तपासले गेले आहेत, असे सांगितले जात आहे.

या दरम्यान, राकेश अस्थाना 31 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. तसेच त्यांची सेवा संपत आहे. म्हणून त्याअगोदर अस्थाना यांना दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून नियुक्त केले आहेे. त्यांचा हा कार्यकाळ हा एक वर्षाचा असणार आहे, असे सांगितले जात आहे. या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.