TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 13 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्‌या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत अर्थात दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्‌या दिल्या आहेत, त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केलाय. त्यामुळे एसईबीसी, ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे व राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्‌यांचे किंवा पदांचे आरक्षण अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालनाने दि. 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती.

त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने या आरक्षणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत दि. 21 फेब्रुवारी, 2015 रोजी शासन निर्णय जारी केला होता. पुढे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले असून आरक्षणाच्या कायदा अस्तित्वात आला आहे.

या कायद्याविरोधातील दाखल रिट याचिकांवर उच्च न्यायालयाने दि. 7 एप्रिल 2015 रोजीच्या आदेशानुसार यास स्थगिती दिली होती.

न्यायालयाचे आदेश लक्षात घेता दि 21 फेब्रुवारी 2015 च्या आदेशात सुधारणा करून ईएसबीसी प्रवर्गाकरिता आरक्षणाबाबत दि. 2 डिसेंबर 2015 च्या शासन शुद्धीपत्रकान्वये सुधारित आदेश दिले होते.

त्यानुसार शासकीय तसेच निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी दि. 14 नोव्हेंबर, 2014 पूर्वी जाहिरात दिलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत नेमणुका करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला होता.

आता 5 जुलै, 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने या नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतलाय.