TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 19 जुलै 2021 – कोल्हापुरातील व्यापार व सर्व व्यवसाय 100 दिवसानंतर आजपासून सुरू झालेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये दुकाने उघडणार मग, पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून दुकाने उघडण्याता निर्णय घेतला आहे.

दुकाने सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. कोल्हापुरमधल्या राजारामपुरी इथल्या व्यापाऱ्यांनी आज दुकान उघडताना सजवलेल्या बैलगाडीतून रॅली काढली आहे.

सनई-चौघडयाच्या गजरात सर्व बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला. दुकानदारांनी मास्क वापरा, असे आवाहनही यावेळी केलं. सुमारे 100 दिवसांनी पुन्हा एकदा व्यापार सुरू झाल्याने उत्साहात असलेल्या व्यापाऱ्यांनी लस घेतलेल्या ग्राहकांसाठी विशेष सवलत देणार आहे, असे घोषित केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 9.7 टक्क्यांवर आलाय. त्यामुळे आजपासून जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केलेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दुकाने आजपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत.