![](https://todmarathi.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-11-at-4.58.34-PM.jpeg)
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 जून 2021 – मागील 40 वर्षातील सर्वाधिक खराब प्रदर्शन भारतीय अर्थव्यवस्थेने केले आहे. 2020-21 या वर्षामध्ये 7.3 टक्क्यांनी जीडीपी घसरला आहे. या संबंधी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने आकडेवारी जाहीर केली आहे. 2020-21 सालच्या चौथ्या तिमाहीत जीडीपी 1.6 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था किती नाजून बनली आहे? हे एनएसओने जारी केलेल्या या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.त्यामुळे जीडीपी घसरण्यामागची नेमकी कारणं शोधण्याची गरज आहे.
कोरोनामुळे देशात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी कडक लॉकडाऊन लावला होता. जुलै 2020 नंतर हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवले. पण, या दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार मागील वर्षी एप्रिल ते जून या दरम्यान 24.38 टक्क्यांनी आकसला.
यात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये काही सुधारणा झाली होती. नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेत 0.4 टक्के वृद्धी झाली होती. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 1.6 टक्क्यांची वाढ झाली. त्या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2019-20 साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास केवळ 4 टक्क्यांनी झाला.
जीडीपीत यंदा सुमारे 8 टक्क्यांची घसरण होईल, अशी शक्यता एनएसओने व्यक्त केली होती. या अगोदर 1979-80 या आर्थिक वर्षात दुष्काळ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने देशाच्या जीडीपीत 5.3 टक्क्यांची घसरण झाली होती. आता त्यापेक्षाही आणखी म्हणजे 7.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
देशाचा ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्येही 6.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षी ही घसरण 4.1 टक्के एवढी होती. केवळ कृषी, वने आणि मासेमारी या क्षेत्राने 3.6 टक्के आणि इलेक्ट्रिसिटी, गॅस आणि पाणीपुरवठा क्षेत्राने 1.9 टक्के वृद्धी दर्शवलीय. ही दोन क्षेत्रे वगळता इतर सर्वच क्षेत्रात विकास झाला नाही, अशी स्थिती आहे.