TOD Marathi

मुंबई :

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आधीच वादात सापडलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आता शहीदांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. मुंबईवरील झालेल्या २६/११  च्या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून आदरांजली वाहिली. (Governor Bhagatsingh Koshyari criticized) यामुळे हा शहिदांचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका झाली. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यासोबतच शिवरायांच्या वंशाजांनीही कोश्यांना हटवण्याची मागणी केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी हे दिल्लीला गेले होते. कोश्यारी दिल्लीला गेल्याने राज्यपाल पदावरून दूर होणार का? अशा चर्चाही सुरू झाली होती. पण भगतसिंह कोश्यारी पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारींच्या आजच्या एका कृतीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ (6/11 terrorist attack on Mumbai) ला मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह इतरही जवान शहीद झाले होते. तसेच अनेक निष्पाप नागरीक ठार झाले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील पोलीस स्मारकाच्या ठिकाणी शहीदांना आज आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी पायातील पादत्राणे काढली. (Governor Bhagatsingh Koshyari, CM Eknath Shinde and DCM devendra Fadnavis paid tribute to martyrs of 26/11 attack) पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायातील चप्पल काढली नाही. चप्पल घालूनच राज्यपाल कोश्यारी यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. यामुळे राज्यपालांच्या या कृतीवर आता टीका होत आहे. राज्यपालांनी शहीदांचा अपमान केला आहे, अशी टीका केली जात आहे.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ही टीका केली आहे. (Congress leader Sachin Sawant criticized Governor Bhagatsingh Koshyari) अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान पोलिस प्रशासनाशी बोलून घेतले असते. 26/11 च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पल काढली जात नाही. तशा पद्धतीचे ब्रिफिंग पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अभिवादन करायला येणार्‍या मान्यवरांना करीत असतात, असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या एकूण १९७ जण ठार झाले होते आणि ८०० हून अधिक नागरीक जखमी झाले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. याच दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात यश आलं होतं. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाने हा हल्ला घडवून आणला होता.