TOD Marathi

E-Pass : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी जायचं असेल तर ‘असा’ बनवा ई-पास

टिओडी मराठी, दि. 18 मे 2021 – सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन वाढविला असून त्याची मुदत 1 जून 2021 पर्यंत केली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारणत: मागील महिन्यापासून लॉकडाऊनअंतर्गत लागू असलेले कडक निर्बंध आता 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. अशा वेळी जर तुम्हाला अत्यावश्यक प्रवासासाठी जायचं असेल तर ‘ई-पास’ काढावा लागेल. तो ‘ई-पास’ कसा काढायचा याची आपण माहिती घेऊया.

महाराष्ट्र सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. त्यामुळे संचारबंदीसह लागू केल्याने सर्व नियम लागू असतील. केवळ अत्यावश्यक सेवा व योग्य कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे सांगितले आहे.

बाहेर जायचं असेल तर रीतसर परवानगी हवी आहे. अत्यावश्यक कारणासाठी आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना हवी असे तर त्यासाठी ई-पास घ्यावा लागणार आहे. पण, जिल्हाबंदीचे नियम काय आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने राज्यात जिल्हाबंदी लागू असेल, याचा अर्थ नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
यादरम्यान, अत्यावश्यक कारणासाठी प्रवासाची परवानगी नागरिकांना हवी असेल तर त्यासाठी ‘ई-पास’ घ्यावा लागेल, असं पोलिसांनी म्हटलंय.

जाणून घ्या, ई-पास कुणाला मिळणार?
बस व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त अतिशय आवश्यक कारणासाठी खाजगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी दिली जाते. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतोय. पण, आदेशात नमूद केल्याप्रमाणे त्यांना गृह विलगीकरणात राहावं लागणार आहे.

यासह इतर राज्यांत अडकलेले लोक विमान, लांब पल्ल्यांच्या रेल्वे, बस, खाजगी वाहनं किंवा टॅक्सीने आपल्या शहरात परत येतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातल्या विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सीचा वापर करता येऊ शकतो. पण, त्यासाठी प्रवाशांच्या मूळ शहरात विमानतळ नाही, हे सिद्ध करावं लागेल.

टॅक्सीतील प्रत्येक प्रवाशाकडे बोर्डिंग पास असणं आवश्यक आहे. या नियमाचा दुरुपयोग होताना आढळला तर कडक कारवाई होईल. व्यापारासाठी आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी नाही, याची नोंद घ्यावी.

नव्या नियमांत आंतरजिल्हा प्रवासासाठी कोणती कारणं रास्त ठरतील? याचा उल्लेख केलाय. पोलीस संबंधित पुरावे स्वीकारू शकतील. रास्त कारण आणि त्याचे पुरावे यांची शहानिशा करण्याची जबाबदारी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला दिली आहे.

मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारचा ई-पास दिला जात होता. पास मिळवण्यासाठी यंदाही नागरिकांना तीच प्रक्रिया करावी लागत होती.

पोलीस प्रशासनाने ई-पास वितरीत करण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ ही वेबसाईट बनवली असून त्यात खालील दोन पर्याय तुम्हाला दिसतील.

1. पासकरिता अर्ज करण्यासाठी (Apply For Pass Here)

2. आपल्या अर्जाची प्रक्रिया कुठेपर्यंत आलीय ते पाहण्यासाठी किंवा पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी (Check Status/Download Pass).

अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून एक ते दोन दिवसांत अर्ज निकाली काढला जातो. पण, कधी त्याला जास्त वेळही लागेल. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या प्रवासाचं नियोजन करावे.

हे आहेत अर्ज प्रक्रियेतील टप्पे –
1. आपल्या ब्राऊजरमध्ये https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटची लिंक टाईप करावी . याठिकाणी तुम्हाला वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय आढळतील.

2. तुम्हाला ई-पासकरिता अर्ज करावयाचा असेल, तर Apply For Pass Here या बटणावर क्लिक करावे.

३. पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. यात योग्य पर्याय निवडून पुढे जा.

4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासाची सर्व माहिती सविस्तरपणे भरावी लागेल. यात तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इ-मेल आयडी, प्रवास सुरू होण्याचं ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात किंवा नाही, त्याशिवाय, परतीचा प्रवास या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

या अर्जासह तुम्हाला तुमचा फोटोही जोडावा लागेल. फोटोची साईज 200 KB पेक्षा अधिक नसावी. फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे देता येऊ शकतात. प्रत्येक फाईलची साईज 1 MB पेक्षा अधिक नसावी.

तसेच तुम्ही सांगितलेल्या गरजेच्या कारणाशी संबंधित संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतीही तुम्हाला याठिकाणी अपलोड कराव्या लागतील.
डॉक्टरांकडून मिळालेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी लिंक दिली आहे.

वरील सर्व माहिती योग्यरित्या भरून Submit बटणावर क्लिक करावे, म्हणजे तुमचा अर्ज पोलिसांकडे जाईल.

5. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी मिळेल. हा तुमचा अर्ज क्रमांक आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला गेला याची माहिती मिळवण्यासाठी हा अर्ज क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा टोकन आयडी सेव्ह करावा.

6. तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नाही याचा माहिती तुम्हाला पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर मिळेल. त्याठिकाणी आपला टोकन आयडी नंबर टाकून क्लिक केल्यास अर्ज डाऊनलोड करण्यासाठीचा पर्याय दिसेल. अर्ज नामंजूर झाला असेल तर तशी माहिती त्याठिकाणी दिली असेल.

अशा प्रकारची प्रक्रिया करून तुम्ही ई-पाससाठी अर्ज करू शकता. पण, नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कारणांसाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळे गरज असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडावे.