TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 जून 2021 – 11 वी प्रवेशाबाबत सामाईक प्रवेश परीक्षा होणार आहे, अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अखेर अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. 10 वी इयत्तेचा निकाल आता शाळांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार घोषित केला जाणार आहेत. याचा परिणाम 11 वीच्या प्रवेशावर देखील झाला आहे. यानुसार 11 वी प्रवेशामध्ये एक वाक्यता येण्यासाठी सरकार वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा घेणार आहे

विविध परीक्षा मंडळांकडून शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, यासाठी सीईटीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिना अखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित करणार आहे.