TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 जून 2021 – कोरोना काळात चित्रपट चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्यावर काही कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. यावेळी अशांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याला काहींनी प्रतिसाद दिला. काही मोठ्या फिल्मस्टारसह निर्मात्यांनी चित्रपट महामंडळाला भरघोस आर्थिक मदत केली. मात्र, केलेली मदत कुठे गेली ?, कोणाला मिळाली?, महामंडळाने आकड्यात मदत जाहीर का नाही केली? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अखिल महाराष्ट्राच्या कलावंतांच्या वतीने विचारला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूरचे धर्मादाय उपायुक्त यांना दिले आहे.

बाबासाहेब पाटील यांनी सांगितले कि, कोरोना काळात विविध स्तरातून कलावंतांना आन्नधान्य किट आणि आर्थिक मदत देण्यासाठी काहींचे हात सरसावले. ज्यात प्रामुख्याने चित्रपट फिल्मस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते रितेश देशमुख, मुळशी पॅटर्नचे निर्माते पुनीत बालन आदींचा समावेश होत आहे. त्यांनी भरभरून आर्थिक मदत अर्खिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला केली. परंतु, महामंडळाचे एक छत्री हुकमशहा असलेले अध्यक्ष यांनी त्या मदतीचे नेमके काय केले?, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील कलावंत विचारत आहे.

तसेच कलावंतांसाठी आलेली इतकी भरघोस मदत महामंडळाने आकड्यात जाहीर का केली नाही?. आलेली आर्थिक मदत कोणत्या कलाकारांना दिली? त्यांचे नावे का जाहीर केली नाहीत?. अनेक लोकांनी कलाकारांना आन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या किट दिल्या आहेत. त्याचे वाटप कुठे झाले?, असा सवाल बाबासाहेब पाटील यांनी अखिल महाराष्ट्राच्या कलावंतांच्या वतीने विचारला आहे.

चित्रपट महामंडळाचे कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, बीड, सातारा, नगर रोह अशा अनेक ठिकाणी कार्यालय आहेत. हि कार्यालये कशासाठी आहेत?. तेथील कलावंतांना का किट वाटप केले नाही?. ते कार्यालय केवळ सदस्यसंख्या वाढवून गठ्ठा मतदान गोळा करण्यासाठी तयार केलेत का..? असे अनेक सवाल काही कलावंत खाजगीत विचारात आहेत.

अशातच या चित्रपट महामंडळाची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशावेळी अनेक मतदार कलावंत याचा जाब विचारतील, यात शंका नाही. म्हणून अध्यक्ष मेघराज भोसले आणि त्यांच्यासह काम करणाऱ्यांनी महामंडळाच्या कामाचा हिशोब कलावंताच्या समोर ठेवावा, अशी विनंती राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.