TOD Marathi

टिओडी मराठी, पंढरपूर, दि. 29 जून 2021 – अगोदर शहरात लसीकरण करा, नंतर आषाढी वारी भरवा, अशी मागणी पंढरपूरमधील नागरिकांनी केली आहे. यंदा या 10 मानाच्या पालखी सोहळ्यासोबत प्रत्येकी 40 अशा 4 हजार वारकऱ्यांना परवानगी दिलीय. त्यांच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थापनासाठी किमान अडीच ते 3 हजार पोलीस आणि इतर विभागाचे अधिकारी अधिकृतपणे पंढरपूरमध्ये येणार आहेत.

कोरोनाचा धोका कायम असलेल्या पंढरपूर शहरातील लसीकरणाची अवस्था मात्र दयनीय आहे. सव्वा लाखाच्या शहरात केवळ 18 ते 19 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. एवढ्या मोठ्या शहरात आठवड्याला केवळ दीडशे ते दोनशे लसींचा साठा मिळत आहे, त्यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे.

यातही मागील 23 जूननंतर पंढरपुरात लस आली नाही, त्यामुळं शेकडो नागरिक लसींची वाट पाहत लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर शहराची अवस्था गंभीर बनली होती. अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे नागरिकांत कोरोनाची भीती कायम आहे.

अशावेळी पुन्हा आषाढी वारीला वारकरी येणार आहेत. त्यामुळे अगोदर लसीकरण करा आणि मगच वारी भरावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. आम्ही विकत लस घेण्यास तयार आहोत. शहरात 14 केंद्रांना परवानगी दिली तर त्यांना लसी पुरवल्यास आम्ही पैसे देऊन लसीकरण करून घेऊ, अशी भूमिका शहरातील व्यापारी घेताहेत.

शहरातील नागरिकांचे लसीकरण मागील 7 दिवसापासून बंद होते, असे असताना आज मात्र पालखी प्रस्थानासाठी परवानगी दिलेल्या वारकरी महाराजांची तपासणी करून लसीकरण केले आहे.

आता शासनाला वारी भरवायची असेल तर दररोज किमान एक हजार लसी शहरातील नागरिकांना देऊन लसीकरणाला मोहिमेला वेग द्यवा, अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केलीय. अन्यथा जो फटका निवडणुकीचा बसला तशीच मनुष्यहानी आषाढीनंतर होऊ नये, हीच अपेक्षा नागरिक करीत आहेत.