TOD Marathi

मुंबई | मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करून या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज, मुंबई महापालिकेवर मोर्चा धडकणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे यांचा पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, त्याद्वारे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न होणार आहे. ‘मुंबईत मुसळधार पाऊस असला, तरी मोर्चा निघणारच, मुंबईची वाट लावू पाहणाऱ्यांना जाब विचारणार,’ असे ‘ट्वीट’ आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

‘कॅग’ने ठपका ठेवलेल्या मुंबई महापालिकेतील कथित १२ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्याची शिंदे यांची रणनीती आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट फर्निचर आणि खडीकामात घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करून एक जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, खासदार, आमदार, माजी नगरसेवक सहभागी होणार आहेत.

हेही वाचा” …“अजित पवार मनातून बोलत नाहीत”, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, म्हणाले…”

हा मोर्चा शनिवारी दुपारी तीन वाजता मेट्रो सिनेमा येथून निघेल. मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या दिशेने धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. मोर्चाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईत बॅनरबाजी केली आहे. याशिवाय समाज माध्यमांत जोरदार प्रचार केला आहे.

भाजपने पालिकेतील २५ वर्षांतील सत्तेत ठाकरे गटाने पालिकेची लूट केल्याचा आरोप लावून धरला आहे. त्यास ठाकरे गटाकडून सडेतोड उत्तर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. २५ पैकी २० वर्ष भाजप मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी होता. अनेक महत्त्वाच्या समित्या आणि पदांवर भाजपचे नगरसेवक होते. तेव्हा पालिकेतील भ्रष्टाचार का दिसला नाही, असा प्रश्न सेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.