TOD Marathi

राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने BJP सोबत यावे – Ramdas Athavale ; म्हणून आम्ही भाजपसोबत, विधानसभेला जागा वाढविणार

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचे असेल तर शिवसेनेने पुन्हा भाजप सोबत युती करण्याची गरज आहे. भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केला. यानंतर, उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यानंतर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते गणेश बीडकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, शैलेश चव्हाण, नगरसेविका फरझाना शेख, हिमाली कांबळे, असित गांगुर्डे, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, रोहिदास गायकवाड, निलेश आल्हाट, संगीता आठवले, शशिकला वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, पुण्याचा विस्तार होत आहे. ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेलीय. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात.

पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. ‘गो कोरोना गो’ म्हणत होतो. मात्र, मलाच कोरोना झाल्याने मी आता ‘नो कोरोना नो’ म्हणतो.

कोरोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून देऊन रुग्णालय उभे केले.

आता कोरोनाच्या तिसरी लाट येईल यासाठी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. तसेच राज्यांना मदत केली आहे, मुख्यमंत्र्यैंसोबत बैठका झाल्यात. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आपण मात करू शकतो.

भाजपच्या पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्यात. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होणार आहे.

जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक आहे. त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे,? हे निश्चित करणे सोयीचे होणार आहे. तसेच सर्वाना न्याय देता येणार आहे.

मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करायला हवेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे. कोणत्या जाती कोणत्या गटामध्ये टाकावेत? याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण व नोकरीचे आरक्षण मिळेल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे आता महापालिकेमध्ये पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झालेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार आहे.

नगरसेवकांची संख्या वाढविणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने आणखी जागा मिळतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.