TOD Marathi

जिल्हा प्रशासनाला उपलब्ध असलेल्या नियत्व व गेल्या वर्षी झालेला खर्च व यावर्षी उरलेल्या निधीतून सर्व शंभर टक्के निधी खर्च करणे याबाबत चर्चा बैठकीत झाली. आधी मी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली त्यांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतले आहे.  यावर्षीचा 618 कोटीचा निधीचा आराखडा आहे. या आधी एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना जशी पद्धत होती त्याच पद्धतीने यादी मागवणे त्याचा प्राधान्य क्रम निश्चित करणे व वेळेत काम पूर्ण करणे अशाच पद्धतीने मी काम करणार आहे अशी प्रतिक्रीया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Thane Guardian Minister Shambhuraj Desai) यांनी दिली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली. मी उत्तम काम करून दाखवेल, असंही देसाई म्हणाले.

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागाकडे जाणारे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण भागाची जोडणारे रस्ते हे दोन टप्प्यात तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत, रस्त्यांवर पॅच करून डागडुजी करून रस्ता योग्य करण्यात यावा, किंवा जो रस्ता जास्त खराब झाला आहे तो पूर्णपणे नवीन करण्यात यावा अशे आदेश दिले आहेत, आदिवासी पाड्यातील देखील रस्ते सुधारण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत. प्रामुख्याने आदिवासी पाड्यात साकव कार्यक्रम हे राबवण्यात यावे असे आदेश दिलेत त्याबाबतचा आराखडा तयार करायला सांगितले आहे.

ठाणे शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आधीच योजना तयार केलेल्या आहेत. हा जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आहे, त्यांनी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांची जी कामाची पद्धत आहे तीच कामाची पद्धत पुढे चालू ठेवून मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळेल व ठाण्यातील कोणत्याही नागरिकाला मी बाहेरचा आहे असं वाटणार नाही अशी मी दक्षता घेईल. असंही देसाई म्हणाले.