TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जून 2021 – अयोध्येतील राम मंदिरासाठी जमिनी खरेदी प्रकरणात आता भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र, या ट्रस्टकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहे.

या दरम्यान शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबंधी भाष्य करत संताप व्यक्त केलाय. तसेच याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केलीय.

याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, आपचे खासदार संजय सिंग यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा करुन माहिती दिलीय. प्रभू श्रीराम आणि अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे.

काही जणांनी त्याचं राजकारण केलं असेल पण, आम्ही नाही. ट्रस्टचे सर्व सदस्य भाजपच्या सरकारच्या वतीने नेमले आहेत. आमच्यासारख्या संघटनेचाही सदस्य असावा, असं आम्ही सांगत होतो. पण त्यांनी तसं केलं नाही.

‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचं काम सुरु होतं. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी आपल्यातर्फे एक कोटींची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून निधी गोळा केला. संपूर्ण जगातून शेकडो कोटींचा निधी राम मंदिरासाठी लोकांनी दिला.

प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा होऊ नये. पण, जे जमिनीचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही,’ असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

‘माझ्याकडे जी माहिती आली आहे त्यातून गडबड असल्याचं दिसतय. जर हा घोटाळा झाला असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वांसमोर येऊन शंका दूर केली पाहिजे. सरकारच्या वतीने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा.

विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी खुलासा करणं आवश्यक आहे. अयोध्येसाठी लढा देणाऱ्या आमच्यासारख्यांना नेमकं काय झालं? आहे हे कळणं गरजेचं आहे,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.

‘संजय सिंग यांनी जे पुरावे समोर आणले आहेत, ते धक्कादायक आहेत. भूमीपूजन झालं तेव्हा मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हि होते. त्यामुळे योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनीही जे समोर आलंय त्यात तथ्य आहे की नाही? हे जनतेला सांगावं,’ असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.