TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जून 2021 – काँग्रेसचे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला आहे.

जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले, राहुल गांधी यांच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन बुडालाय. आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, असा टोला निलेश राणे यांनी हाणला.

या दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील युवानेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपत प्रवेश केला. जितीन प्रसाद यांना मागील काही काळापासून काँग्रेसने पक्षातील केंद्रापासून काहीसे दूर केले होते. मात्र, त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आली असताना पक्ष सोडून भाजपात जाणे पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय.

२००४ मध्ये जितीन प्रसाद यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान यूपीओ-१ च्या काळामध्ये त्यांना मंत्री बनविले होते. तेव्हा त्या सरकारमधील युवा मंत्र्यांपैकी ते एक होते. सन २००९ मध्ये जितीन प्रसाद यांनी धौराहा लोकसभा मतदार संघातून लढून विजय मिळवला होता.

यूपीए-२ सरकारच्या काळामध्ये त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या जबरदस्त मोदी लाटेत त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१७ मधील उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. या पराभवांनंतर ते काँग्रेसच्या राजकारणातील मुख्य प्रवाहापासून काहीसे बाजूला फेकले गेले होते.