TOD Marathi

कोल्हापूर: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या निधनामुळे एक संघर्ष यात्री हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.
प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च  केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.
अध्यापन कार्य :
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
राजकीय कारकिर्द :
1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 : शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 : सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते
एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान /पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन,परभणी अध्यक्षपद : 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य –
प्राध्यापक औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.