TOD Marathi

नवी दिल्ली | मणिपूरमधील हिंसा रोखण्यात अपयशी ठरलेले मुख्यमंत्री एम बिरेन सिंह यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असतानाच, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, मणिपूरमधील भयानक हिंसा म्हणजे मानवी शोकांतिका असून या घटनेने देशाच्या सदसद्विवेकावर जबर घाव घातला असल्याची खंत व्यक्त केली आहे.

सोनिया गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या दोन मिनिटांच्या व्हीडिओमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही. मात्र, मणिपूरमध्ये ३ मे पासून होत असलेल्या हिंसाचारात लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचा संदर्भ देत, सोनिया गांधींनी, केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारांना अप्रत्यक्ष चपराक दिल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा “…अजित पवारांच्या भाषणानंतर जयंत पाटलांचा बोलण्यास नकार, मात्र…”

दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. अनेकांना घर सोडून जावे लागले, आयुष्यभराची कमाई एका फटक्यात गमवावी लागली. शांततेने एकमेकांसोबत राहणारे आपल्या  बंधुभगिनींवर अत्याचार होताना पाहणे हृदयद्रावक आहे, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. मणिपूरने आतापर्यंत सर्व जाती, धर्म आणि वेगवेगळय़ा पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेतलेले आहे. बंधुभावाने राहण्यासाठी एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. पण, द्वेषाची ज्वाळा पेटवण्यासाठी एक चूक पुरेशी असते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.