TOD Marathi

मुंबई | एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक २७ जूनला मुंबईत जाहीर झालं. क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताची लढत अहमदाबादमध्ये होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबर रोजी हा सामना खेळवला जाईल. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील हॉटेलचे दर कैक पटींनी वाढल्याचं समोर आलं आहे.

ही घोषणा झाल्यापासून अहमदाबादमधील हॉटेल्सचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ज्या आलिशान हॉटेल्सचे दर ५ हजार ते ८ हजार रुपये होते. तिथे आता ५० हजार ते १ लाख रुपये भाडे आकारण्यात येत आहे, अशी माहिती हॉटेल्स बुकींगच्या संकेतस्थळावरून मिळाली आहे.

हेही वाचा” …राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, फडणवीसांनी दिली माहिती”

सौराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नरेंद्र स्वामी यांनी सांगितलं की, “सामना पाहण्यासाठी बाहेरून अनेक लोक येणार आहेत. अहमदाबादमधील हॉटेल्सची क्षमता १ लाख ३२ हजार आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून हॉटेल्सनी किमतींत वाढ केली आहे. शहरातील आलिशान हॉटेल्समध्ये १५ ऑक्टोबरसाठीच्या सर्व रुम बुकिंग करण्यात आल्या आहेत. दरवाढ फक्त आलिशान हॉटेल्सपुरतीच मर्यादित आहे.”

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील फायनलसह पाच सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.  दुसरा सामना १५ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आहे. तिसरा सामना ४ नोव्हेंबरला इंग्लंड आणि ऑस्ट्रोलियाच्यात रंगणार आहे. चौथा सामना १० नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये होईल. तर, पाचवा आणि फायनलचा सामना १९ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.