TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जून 2021 – पोलीस विभागातील वाझे तर सापडला पण, अन्य विभागातील सचिन वाझेचा पत्ता आम्हाला लागलाय. म्हणूनच मंत्री झाले राजे अन प्रत्येक विभागामध्ये एक वाझे झालेत, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या सरकारने केवळ दोन दिवसांचे अधिवेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू असून कुणाला कशाचा थांगपत्ता नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामागे सरकारचे पळपुटे धोरण आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवाल उपस्थित केला. हे सरकार नसून ही सर्कस सुरू आहे, असा हल्लाबोल देखील केला.

कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टार्गेट केलं. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं हे सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज्यात फक्त अनागोंदी कारभार सुरू असून एक दिवस निर्णय घेतला जातो, मग दुसऱ्या तासाला स्थगिती दिली जाते. गम दुसऱ्या दिवशी निर्णय बदलला जातो. इथं राज्यात कोरोना काळात किड्यामुंग्यासारखी माणसं मरत असताना चांगलं काम केल्याचं सांगत स्वत:च पाठ थोपटवून घेतली जात आहे, असा घणाघात फडणवीसांनी यावेळी केला.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्राचे नाव देशात बदनाम झालंय. देशातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक ३३ टक्के मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाले. ऑक्सिजन नाही म्हणून माणसं रस्त्यावर मेली, हे कुठलं कोरोना मुक्तीचं मॉडेल? कुणी आणलं हे मॉडेल? देशात कोरोनामुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रामधील आहे.

ही मान शरमेनं खाली घालण्यासारखी बाब आहे. उत्तर प्रदेशातील गंगा नदीत मृतदेह वाहून आल्याचे वारंवार दाखविण्यात येतं. पण, बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबून नेलं. त्याची फार चर्चा होत नाही. हे कुठलं मॉडेल आहे?, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकारचे पूर्णपणे जबाबदार असल्याचा ठाम दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना डिबेट करण्याचे आव्हान दिलंय.

मी दाव्याने सांगतो. राज्यातील कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण रद्द व्हायला केवळ आणि केवळ राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदर आहे. राज्य सरकारने 15 महिने झोप काढली. मागासवर्गीय आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टाने आरक्षण रद्द केलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.