TOD Marathi

मुंबई | अभिनेते प्रकाश राज यांना चांद्रयानाबद्दल ट्वीट करणं भोवलं आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्याप्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं व्यंगचित्र शेअर केलं होतं. ज्यामध्ये के सिवन हे चहा ओतताना दिसतात. ‘चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव’ असं म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं आणि चांद्रयान-३ ची खिल्ली उडवली. त्यानंतर नेटकरी संतापले आणि त्यांना ट्रोल केलं होतं.

हेही वाचा ” …समर्थकांची काँग्रेसवापसी, ज्योतिरादित्य शिंदेंसमोर मोठं आव्हान”

“द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेष दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिलं? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा” असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश राज हे अनेक सामाजिक व राजकीय घटनांवर ट्विटर आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या भूमिकेमुळे ट्रोलही होतात. त्यांच्या या ट्वीटनंतर ‘प्रकाश राज कधीही द्वेषाचा तुमच्यावर एवढा प्रभाव पडू देऊ नका की तुम्हाला तुमच्या देशाची आणि तुमच्या लोकांची प्रगती आणि प्रयत्नांचा तिरस्कार वाटेल’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या.