TOD Marathi

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि अमित ठाकरे यांची गाडी रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अमित ठाकरे शिर्डीहून मुंबईला परत येत असताना सिन्नर तालुक्यातल्या टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचं सांगण्यात आलं. या वादानंतर त्याच दिवशी (२३ जुलै) रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली.

दरम्यान, या टोलफोडीच्या प्रकरणावर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. राज ठाकरे आज (२६ जुलै) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  त्यावेळी  राज ठाकरे म्हणाले, अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे असं काही नाहीये. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला.

हेही वाचा ” …नाना पटोलेंनी नार्वेकरांसमोरच गुलाबराव पाटलांना सुनावलं”

राज ठाकरे पुढे म्हणाले, त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही.

राज ठाकरे म्हणाले, भाजपने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? ते सांगावं. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावं.