TOD Marathi

औरंगाबाद | मागील तीन महिन्यापासून मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचं उत्खनन करण्याचं कंत्राट पंतप्रधान मोदी यांचा जवळचा मित्र गौतम अदाणींना देण्यात आलं आहे. पण मणिपूरमधील आदिवासी हिल काऊन्सिलनं याला विरोध केला आहे. यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते औरंगाबाद येथे जाहीरसभेत बोलत होते.

हेही वाचा ” …“एकवेळ जेवणारा, पाठीचा कणा वाकेपर्यंत लायब्ररीत बसणारा विद्यार्थी सिरीयस कसा नाही?”; रोहित पवारांचं फडणवीसांना खरमरीत पत्र”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याचं केंद्र सरकार खनिज माफियांना बळी पडलं आहे. मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आदिवासी समुदायावर अत्याचार होत आहे. कारण मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा असणारा प्लॅटिनम धातू सापडला आहे. कुकी समुदाय वास्तव्यास असलेल्या परिसरात ही प्लॅटिनमची खाण सापडली आहे. सरकारने या खाणीतून उत्खनन करण्याचे अधिकार नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळच्या मित्राला म्हणजेच गौतम अदाणींना दिले आहेत. नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी १९६८ सालापासून लंगोटी यार आहेत. दोघांवर १९६८ साली एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अजून निकाल लागलेला नाही. दोघं लंगोटी यार असल्यामुळे सरकारने अदाणींना खनिज उत्खनन करण्याचे अधिकार दिले आहेत.”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “पण संबंधित भागात खनिज उत्खनन करायचं की नाही, याचे अधिकार मणिपूर विधानसभेला नाहीत. तो अधिकार तिथे असणाऱ्या ‘आदिवासी हिल काऊन्सिल’ला आहेत. त्या आदिवासी हिल काऊन्सिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं की, या खाणींचं उत्खनन भारत सरकार करणार असेल तर आम्ही परवानगी देतो. पण खासगी कंपनी उत्खनन करणार असेल तर आम्ही परवानगी देणार नाही. ही देशाची संपत्ती आहे.