TOD Marathi

मुंबई | राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशात जाणीवपूर्वक दंगली घडवून आणण्याचा कट आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पोलिसांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करावी, अशा मागणीचे पत्र नितेश राणे यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांना पाठवले आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्र जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रीयेतून शांततेत सोडवला गेला आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने आनंदाने पुर्णत्वास जात आहे. लोकापर्ण सोहळा तारीख जशी जशी जवळ येतेय तसा देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे.

हेही वाचा ” …सचिन तेंडुलकरनं भारतरत्न परत करावा, अन्यथा…, बच्चू कडू आक्रमक”

अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमी राज्यसभेचे खासदार व सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत हे मे २०२२ पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील अशा वारंवार बातम्या माध्यमातून पसरवत आहेत.

त्यांच्या विधानानंतरच महाराष्ट्रात अचानक काही लोकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आणि त्यामुळे काही भागात दंगलीसुद्धा घडल्या. त्यामुळेच काल दि.२८ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी माध्यमांपुढे विधान केले की “राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय.

जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल.’’ त्यामुळेच त्यांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे आहे. मला खात्री आहे की देशविरोधक संघटनेशी त्यांची जवळीक असावी आणि भारत देशाविरूद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणाऱ्या षडयंत्रांचा ते भाग असावेत म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे.

संजय राऊत यांच्यावर मनी लॉंड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या वृत्तींना ते आपला आदर्श समजतात. माझी आपणास विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी आणि आवश्यकता वाटल्यास न्यायालयीन प्रक्रीयेतून त्यांची नार्को टेस्टही करावी जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल.