TOD Marathi

मुंबई :

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने (Congress Bharat Jodo Yatra) रविवारी महाराष्ट्रातील प्रवास आटोपून मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश घेऊन निघालेल्या या यात्रेने जवळपास अर्धा प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्राचा निरोप घेण्यापूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करणारे ट्वीट केले होते. खासदार संजय राऊत यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Rahul Gandhi called Sanjay Raut and inquired about his health) तुरुंगातील वेदनांविषयी विचारलं आणि लढाईत सोबत असल्याचा विश्वासही दिला. संजय राऊत यांनी ट्विट करुन राहुल गांधी यांच्या फोनवरील संवादाविषयी सांगितलं आहे. (Sanjay Raut informed about this conversation)

“आजच्या राजकारणात कटुता ठासून भरली आहे. द्वेष आहे, मत्सर आहे. खरंतर पूर्वीच्या काळी राजकारण असं नव्हतं. प्रत्येत पक्षात प्रत्येकाचे मित्र असायचे. आपापल्या परीने स्नेह जपायचे. मात्र आज तशी परिस्थिती दिसत नाही. अशा काळात राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला. माझ्या तब्येतीची विचारपूस केली. माझ्या कुटुंबियांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. राजकारणातील आपल्या एका सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या, याबद्दल त्यांना दु:ख वाटलं. हीच तर माणूसकी आहे, हा ओलावा राजकारणातून संपलाय. जो राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून दिसतोय”, असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही जेलमध्ये असताना आम्हाला तुमची चिंता होती. तुमच्या तब्येतीविषयी आम्हाला काळजी होती. तुमची माहिती आम्ही आमच्या इतर सहकाऱ्यांकडून घ्यायचो. देशातलं राजकारण फार काही बरं चाललेलं नाही. प्रेम, शांती आणि सौदार्द वाढवूया, लोकशाही टिकवूया, त्यासाठी लढूया”, असं राहुल गांधी संजय राऊत यांना म्हणाले.

राहुल गांधी यांच्या फोनवरील संवादाची माहिती देतानाच संजय राऊतांनी जुन्या राजकारणाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, “पूर्वीच्या राजकारणात मोठ्या मनाची लोकं होती. प्रत्येक पक्षात ज्याचे त्याचे मित्र असायचे. बंधुभाव होता, प्रेम होतं, आपुलकी होती. विरोधक असला तरी द्वेष नव्हता. कटुता नव्हता. मतभेद होते पण मनभेद नव्हते. पण आजच्या राजकारणातून हे हरवलं आहे. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबीयांसोबत उभे राहिले? आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोकांनी माझी विचारपूस केली? आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबीयांनी ठाकरे आणि पवारांप्रमाणे माझी चौकशी केली, राजकारणात हा ओलावा वाढण्याची गरज आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून आणि गेल्या १४ दिवसांपासून महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ते प्रेमाने भारत जोडायला निघालेले आहेत. शिवसेनेने देखील त्यांच्या यात्रेत सहभाग नोंदवला, त्यांना समर्थन दिलं. जे राजकारणातून हरवत चाललंय, ते हरवलेलं गतवैभव परत मिळविण्यासाठी राहुल गांधी झटत आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.