TOD Marathi

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Hearing in Supreme Court about Maharashtra Political Crisis) सुनावणी होणार होती. त्याप्रमाणे सुनावणी झाली मात्र सत्तासंघर्षाची ही सुनावणी आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. 4 आठवड्यानंतर ही सुनावणी होणार आहे.  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात पुढची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज पहिल्या क्रमांकावरच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण होतं. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर ही प्रकरणावर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर (Constitution Bench) या प्रकरणातील मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये कुणाचा समावेश आहे? 

  1. न्या. धनंजय चंद्रचूड
    2. न्या.एम आर शहा
    3. न्या. कृष्ण मुरारी
    4. न्या.हिमाकोहली
    5. न्या. पी नरसिंहा

या पूर्वी 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी 1 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला होता. विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पक्ष कोणाचा? पक्ष चिन्हावर हक्क कोणाचा? यासंदर्भातला निर्णय निवडणूक आयोग घेईल असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवत ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांना स्वतंत्र पक्ष नाव आणि स्वतंत्र पक्ष चिन्ह दिले होते. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आणि जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होत आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्यसह देशाचंही लक्ष लागलेलं होतं. मात्र, आता पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.