TOD Marathi

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात (Hearing in Supreme Court about Maharashtra Political Crisis) महत्त्वाचा दिवस असणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्या पहिल्या क्रमांकावरच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचंद (Maharashtra Political Crisis) प्रकरण असणार आहे. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर उद्या या प्रकरणावर सुनावणी होत आहे.  न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर (Constitution Bench) उद्यापासून पुन्हा या प्रकरणातील मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख उद्याच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे. घटनापीठाचे कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात उद्याची सुनावणी महत्वाची असणार आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये कुणाचा समावेश आहे? 

  1. न्या. धनंजय चंद्रचूड
    2. न्या.एम आर शहा
    3. न्या. कृष्ण मुरारी
    4. न्या.हिमाकोहली
    5. न्या. पी नरसिंहा

या पूर्वी 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी 1 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती.

राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न 21, 22 जून रोजी सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आतापर्यंत तीन बेंचकडे हे प्रकरण गेलं आहे. सुरुवातीला व्हेकेशन बेंचसमोर याची सुनावणी झाली. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर यावर पाच न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करण्यात आलं आणि आता पाच सदस्यीय खंडपीठाकडे हे प्रकरण आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला होता. विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पक्ष कोणाचा? पक्ष चिन्हावर हक्क कोणाचा? यासंदर्भातला निर्णय निवडणूक आयोग घेईल असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवत ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांना स्वतंत्र पक्ष नाव आणि स्वतंत्र पक्ष चिन्ह दिले होते. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आणि जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होत आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्यसह देशाचंही लक्ष लागलेलं आहे.