![](https://todmarathi.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-05-at-7.56.10-PM.jpeg)
टिओडी मराठी, दि. 10 मे 2021 – कोरोना लसीकरण मोहिमेवरून राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आम्ही देशात पोलीओ लसीकरण यशस्वीरित्या राबवलं होतं. पण, मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही, अशा शब्दांत लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सध्या लालू प्रसाद यादव हे एका प्रकरणात जामिनावर तुरूंगातून बाहेर आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशी परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवणायचे असेल तर लसीकरण प्रक्रिया वेगवान करायाला हवं, असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे.
लालू प्रसाद यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तुलना १९९६-९७ सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी केली आहे. तसेच सध्या सरकार पैसे घेऊनही लस उपलब्ध करून देऊ शकत नाही. १९९६-९७ मध्ये जेव्हा देशात जनता दलाचं सरकार होतं, तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणात जागतिक विक्रम केला होता, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
लालू प्रसाद यादव म्हणाले, त्यावेळी इतकी सुविधा आणि जागरूकताही नव्हती. तरी ७ डिसेंबर १९९६ रोजी ११.७४ कोटी मुलांना व १८ जानेवारी १९९७ रोजी १२.७३ कोटी मुलांना पोलिओचे डोस दिले. तो भारताचा जागतिक विक्रम होता. त्यावेळी पोलिओ लसीकरणाविरोधात लोकांमध्ये भीती होती परंतु पोलिओला मूळापासून संपवण्याचा आमच्या सरकारनं दृढ निश्चय केला होता.
पैसे देऊनही लस नाही :
“आज लोकांकडून पैसे घेऊनही लस उपलब्ध करता येत नाही, हे पाहून दु:ख होत आहे. या साथीच्या काळाक देशभरातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांचं मोफत लसीकरण करण्याची त्यांनी घोषणा करावी, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहेत. राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत निरनिराळी असू नयेत. राज्यांमुळे देशाची निर्मिती होते. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं मोफत झालं पाहिजे, ही केंद्राची जबाबदारी आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केलं.