TOD Marathi

मुंबई | गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी पेटलेलं मणिपूर शांत करा. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे.

मणिपूरच्या विषयावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा होते. पण त्याच विषयावर जर आपल्या संसदेत प्रधानमंत्री चर्चा करु देत नसतील तर ती आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

हेही वाचा” …किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले मी…”

राऊत म्हणाले, मणिपूरमधल्या महिलेच्या नग्न धिंड प्रकरणावरुन संसद सुरु असताना पंतप्रधान मोदी संसदेबाहेर त्यावर प्रतिक्रिया देतात. याचा अर्थ ते संसदेला मानत नाहीत. नवी संसद कशासाठी उभी केली? अदानींवर चर्चा करत नाही, मणिपूरवर चर्चा करत नाही, भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, मग ती संसद हवी कशाला? मग तुम्ही पंतप्रधान कसले आहात? संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात.

मणिपूर हा देशाचाच भाग आहे. मणिपूरची जनता या देशातलीच आहे. मणिपूरच्या एका महिलेला रस्त्यावर आणून तिला नग्न करुन मारलं जातंय. ही देशातल्या १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय ना, आधी मणिपूरमधली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा, अशा शब्दात राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय पंतप्रधान आणि भाजप काहीही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ सांगेन.