TOD Marathi

मुंबई:

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि अनेक लोक भाजपवर तुटून पडले आहेत. गेल्या काही दिवसात भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या शिंदे-फडणवीस सरकारची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis to meet Governor Bhagatsingh Koshyari) त्यानुसार हे दोन्ही नेते राजभवनात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीत काय घडणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्यपालांशी काय चर्चा करणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. (Minister Uday Samant) उदय सामंत यांनी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. आम्ही सगळेजण शिवरायांचा आदर करणारे आहोत. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाने आदराने बोलले पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

 

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?

“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”