TOD Marathi

‘तौक्ते’ नंतर आता ‘यास’ चक्रीवादळाचा तडाखा ओडिशा-बंगालच्या किनारी बसणार; पूर्व भागात पावसाळा सुरुवात होणार

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 25 मे 2021 – नुकतेच देशात तौक्ते चक्रीवादळ येऊन गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ आता पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या 24 तासात ‘यास’ हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार आहे. त्यामुळे या भागाला मोठा तडाखा बसणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘यास’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून 155-165 किमी वेगाने हे वारे वाहणार आहेत. सोमवारी सकाळी ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेले हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे.

मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे. किनारी प्रदेशाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या सरकारने राज्य सचिवालयात एक नियंत्रण कक्ष सुरु केले आहे.

या राज्याच्या किनारी जिल्ह्यांत मेदिनीपुर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, हावडा, हुगळी या प्रदेशात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. ओडिशा सरकारने या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बचाव पथके तयार केली आहेत. संवेदनशील प्रदेशातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यास सुरुवात केली आहे.

तसेच आंध्र, तामिळनाडू अंदमान निकोबार या ठिकाणीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘यास’ या चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच किनारी भागातही राहू नये, असा इशारा दिला आहे.

‘यास’ हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार असून ते 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचणार आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढणार आहे.