TOD Marathi

राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक ही तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असते, किचकट असते त्यामुळे निवडणुकीसंदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे, याबाबत आजची आमची बैठक आहे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीला घाबरुन एकत्र आलोय असं अजिबात नाहीये, असंही संजय राऊत म्हणाले.

१० जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्रितपणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊतांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. मविआचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“या निवडणुकीसंदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे याबाबत आजची बैठक होत आहे. आघाडीचे सर्व आमदार मुंबईत पोहोचले आहेत. तिनही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं आहे. घाबरल्याने या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय असं नाही तर या निवडणुका तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदान कशाप्रकारे करावं कोणत्या पद्धतीने करावं याबाबत आमदारांना मार्गदर्शन महत्त्वाचं आहे म्हणून ही बैठक आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“मविआच्या स्थापनेनंतर हा पहिला प्रसंग आहे जिथे एकमेकांची शक्ती किती हे दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे. मधल्या काळात कुठेही मतदान झालं नाही, त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी संधी आहे, आम्हाला पूर्ण बहुमत आहे. हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतोय, आमच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही, आम्ही रिलॅक्स आहोत, आमचे आमदार रिलॅक्स आहेत, आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांशी सुसंवाद सुरुये”, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही रिलॅक्स आहोत, आमचे आमदारही रिलॅक्स आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. सगळेच पत्ते उघडायचे नसतात मात्र चारही उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.