TOD Marathi

पुणे :

मंत्र्यांचं अर्ध काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्नरांसारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच अवलाद आहे. कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत, असे वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं.

पुण्यात ‘अर्हम फौंडेशन’ आणि ‘वास्तव कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संवाद: स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी” या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सदाभाऊ खोत यांनी विशेष सूचनाही केल्या. पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या लाखोंच्या घरात आहे. तेव्हा राज्यकर्त्यांसमोर आपल्या मागण्या मांडण्याचं व्यासपीठ म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं पाहिजे, अशी विशेष सूचना सदाभाऊ खोत यांनी केली. पुढे बोलता-बोलता त्यांनी राज्यकर्ते रेड्यांची अवलाद असते, असं वक्तव्य केलं.

सदाभाऊ खोत म्हणाले, “वरच्या सभागृहामध्ये आ. गोपीचंद पडळकर आणि मी स्वत: तसेच खालच्या सभागृहामध्ये आ. बच्चू कडू, आ. अभिमन्यू पवार यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम उचलून धरले. बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी लावून धरला होता. आम्ही सगळे नेते तुमच्या बरोबर आहोत, याचं कारण म्हणजे तुम्ही सगळी मुलं गावखेड्यातील आहे, गावगाड्यातील आहेत. तुमचे आई वडील शेता-मातीत राबून तुम्हाला इकडे पैसे पाठवत असतात आणि तुम्हीही रात्रीचा दिवस करुन मेहनत घेत असता. तुम्हाला विशेष सूचना आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय अधिवेशन घ्या. कारण राज्यकर्त्यांना ‘डोक्यांची’ म्हणजे मतदारांची भीती असते. जिकडे जास्त डोकी असतात तिकडे राज्यकर्ते बोलायला लागतात”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्वरांसारखं रेड्यांच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. राज्यकर्ते ही रेड्यांचीच अवलाद आहेत. कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत. म्हणून त्यांना डोकी (मतदार) जास्त दिसली तर तुम्हाला नको असलेलं देखील ते बोलून जातात. शेवटी संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून आपल्याला आपले प्रश्न सोडवून घ्यावे लागतील”