TOD Marathi

मुंबई: अलिकडच्या काळात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरल्या, आर्यन खानला आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात खेचत घेऊन जाणारे ते दोन व्यक्ती NCB चे अधिकारी नाहीत, ते भाजपशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

NCB ने शनिवारी मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. त्या दिवशी आर्यन खानला एक व्यक्ती खेचत एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना फोटो व्हायरल होत होता. नंतर याच व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फीही काढल्याचं व्हायरल झालं होतं. सुरुवातीला हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयाने हा व्यक्ती आपला अधिकारी वा कर्मचारी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले की, ड्रग बाळगल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत तो दुसरा व्यक्ती कोण होता हे एनसीबीने जाहीर करावं. दुसरा एक व्यक्ती, ज्याने मरुन शर्ट घातलेला होता आणि जो अरबाज मर्चंटला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता तोही व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्याचं नाव मनिष भानुशाली असून तो भाजपाचा उपाध्यक्ष आहे.

२०१८ मध्ये पुण्यातील एका २२ वर्षीय तरुणाने के. पी. विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गोसावी याने मलेशिया इथे नोकरी लावून देतो म्हणून त्या मुलांकडून तीन लाख रुपये घेतले पण त्याला नोकरी दिली नाही असा आरोप होता. मनिष आणि के.पी गोसावी या दोघांचे एकत्रित बड्या मंत्री, नेत्यांसोबत फोटो आहेत. मनिष आणि के. पी. गोसावी त्या रात्री आरोपींसोबत एनसीबी कार्यालयात काय करते होते हा मोठी प्रश्न आहे.