TOD Marathi

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षासाठी ही अतिशय महत्वाची घडामोड आहे. (Historic Day for Congress Party) दोन दशकांहून अधिक काळानंतर काँग्रेस पक्षात निवडणूक झाली आहे आणि या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष पद हे बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीकडे जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात ही लढत झाली आहे. (Congress President Election between Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor) ही लढत पक्षातच असली तरी काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहीत दोन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या होत्या.

एकतर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडला गेला पाहिजे. या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्षात ही घडामोड होत आहे. निवडणुकीचे निकाल लवकरच हाती येतील. कॉंग्रेस मुख्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे. काही वेळातच निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे स्पष्ट होईलच मात्र नव्या अध्यक्षांना पक्षात सर्वाधिकार असतील का? हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यापैकी कोणीतरी एक काँग्रेसची यापुढे सूत्र सांभाळणार आहेत. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी एक वक्तव्य केलं होतं की नव्या अध्यक्षांनाही गांधी घराण्याचा सल्ला घ्यावा लागेलच त्यामुळे नव्या अध्यक्षांनाही हवी ती मोकळीक मिळणार का? हा प्रश्न आहे.