TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी याअगोदर जाहीर केली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्बंध लागू केले आहेत. त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध आणखी शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि. 8 ऑगस्ट 2021 ) रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. यात राज्यातील कोरोना परिस्थिती, कोरोना लसीकरण, लोकल प्रवास या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. सध्या मुंबईच्या लोकलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना असलेली प्रवास बंदी यापुढील काळातही कायम राहणार का?,

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार का? याबाबत सरकार कोणता निर्णय घेणार आहे, याकडे लक्ष असणार आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केलेत.

या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे, म्हणून त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे.

वर्षा इथल्या समिती सभागृहात शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रमुख संघटनांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली आहे.

या बैठकीस संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टास्क फोर्सचे डाॅ. शशांक जोशी, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, डॉ. पी. व्ही शेट्टी, रवी शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी, एफएचआरएआयचे गुरबक्षीस सिंग कोहली आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत करायचे आहे. आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केलेत. त्यात मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केलीत.

पण, इनडोअर बाबींबाबत सावध पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली, तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे.