TOD Marathi

मुंबई:
राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान (Rajyasabha Election) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. सकाळपासून विधानभवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुरू झालेले मतदान पूर्ण झाले असून लवकरच मतमोजणीला सुरुवात होत आहे. राज्यसभेची ही निवडणूक भाजप (BJP) आणि शिवसेनेने (Shivsena) प्रतिष्ठेची केली होती. राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. (Rajya Sabha Election 2022 Voting)

राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले. मतदानावेळी भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मत बाद करण्याची मागणी केली होती. भाजपने एकूण तीन मतांवर आक्षेप घेतला होता. यामध्ये आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे. काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनीही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला होता.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विधानभवनातून घरी निघाले, त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विजयाचा गुलाल उधळणार का असा प्रश्न केला. ‘गुलाल आम्हीच उधळणार’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.