TOD Marathi

राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी मविआचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार रिंगणात  आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे. भाजपाच्या ६०  आमदारांनी मतदान केलं आहे. आत्तापर्यंत १०० जणांचं मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले. मतदान बाकी असलेले आमदार – धनंजय मुंडे, सरोज अहिरे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते, छगन भुजबळ, सुमन पाटील, अशोक पवार

राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत!

राष्ट्रवादीचे 3 आमदार अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते-पाटील, आशुतोष काळे अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेलाही हे तिघे उशिरा पोहोचणार असं एकंदरीत चित्र आहे.

मत दिलं नाही तर सरकार धोक्यात येईल; कॉंग्रेसने पहाटे दिला निर्वाणीचा इशारा

शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने रात्रभर चाललेल्या चर्चांनंतर दिला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट होताहेत काय असा थेट प्रश्नही कॉंग्रेसने केला आहे.विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सतत पुढे ढकलली जाते आहे.शक्य असूनही मते दिली जात नाहीत हा प्रकार आहे तरी काय अशी संतप्त विचारणा पहाटे पहाटे केली गेली.

मुक्ता टिळक पुन्हा ऍम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना

निवडणुकीसाठी कसब्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाल्या पक्षाला गरज असल्यामुळे मी मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलंय, मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.