TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 जुलै 2021 – सध्या देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. लवकर सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोरोना उद्रेकानंतर शाळा, कंपनीच्या बसेस व वाहने गरजू रुग्णांच्या सेवेकरिता ॲम्ब्युलन्स सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील 50 ॲम्ब्युलन्स चालक, व्यवस्थापक, स्कूल बस मालक व स्कूल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजभवन येथे सत्कार केला होता. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशासह राज्यातील लोकांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. या कठीण प्रसंगी कोरोनायोद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूतांप्रमाणे काम केलं आहे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, सचिव दीपक नाईक व महासचिव रमेश मणियन आदी उपस्थित होते.