TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जून 2021 – राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल आणि मुख्यमंत्री बदलले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांना आज त्यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेले अकोल्यातील मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते म्हणाले, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे. त्याला उत्तर देताना म्हणालो की, त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री?’

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले मत मांडले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे ही जनभावना आहे. मी ‘मन की बात’ सांगत नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.