TOD Marathi

कोल्हापूर: राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच त्यांनी आज मुरगुड पोलिस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे. . हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. अज्ञात कंपनीच्या नावाने बॅंक अकाऊंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कायदा समजवला. त्यांच्याकडे पुरावे देखील दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.