TOD Marathi

औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. तर, उस्मानाबादमधून जाणऱ्या तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि कन्नड या दोन तालुक्यांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे. शिऊर-आलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बनोटी, निंबायती, निंभोरा, सावळदबारा, पित्तूर या गावांत घरांची पडझड झाली असून काही घरांमध्ये पाणीही शिरले आहे.

लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणाचे आठराही दरवाजे उघडण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सारसा गावातील लोक अडकले असल्याची माहिती आहे. पावसाचा वेग अजूनही जोरदार आहे. बीड जिल्ह्यात २४ तासात सावधनतेचा इशारा देण्यात आला असून अंबाजोगाई आणि केज येथील पुरस्थितीचा सामना करणाऱ्यांना सुखरुप हलविण्यात आल आहे.

परभणी जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरू आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान पोहचत असून काही ठिकाणी पुरातील व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.