TOD Marathi

दुगारवाडी (Dugarwadi) येथे झालेल्या दुर्घटनेबाबत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Nashik Collector) कडक पाऊले उचलत संबंधित तहसीलदारांना इशारा देत पर्यटन स्थळावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर (Nashik Tourist Place) पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

नाशिकसह (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवार असल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी होती. मुसळधार पावसामुळे दुगारवाडी धबधबा ओसंडून वाहत होता. सुट्टीच्या निमित्तानं धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक अडकले. मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक तिथे अडकले होते. पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर बचावकार्य सुरु झाले आणि रात्री उशिरा 17 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. मात्र यापैकी एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला. दुपारच्या सुमारास संबंधित व्यक्तीचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागल्याची माहिती गंगाथरण डी. यांनी दिली.

दरम्यान दुगारवाडीसह त्र्यंबकेश्वर परिसरतील ब्रम्हगिरी, पहिने अशा परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. आपल्या जीवाची काळजी न करता जीव धोक्यात घालून पर्यटन करीत असतात. त्यामुळे या सर्वावर निर्बंध म्हणून जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर आता बंदी घालण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटक तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी न जाण्याच्या सूचना देखील यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी दिल्या.

पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर 09 ऑगस्ट रोजी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागात तुरळक ते घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.