TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल फेल ठरलं आहे. यावर जगातील प्रसिद्ध ‘द लॅन्सेन्ट जर्नल’ मध्येही मोदी सरकारच्या कारभारावर वाभाडे काढले आहेत. बिहारच्या बक्सरमध्ये नदीच्या घाटावर मृत्यूदेहांचा खच आढळून आला होता. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रासह उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली आहे. मलिक म्हणाले कि, राम राज्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांना रामभरोसे सोडले आहे.

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज हजारोने लोक मरत आहेत. रुग्णसंख्या काही केल्या तरी कमी होत नाही. त्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, आता इथे एवढी भयावह परिस्थिती निर्माण झालीय. अंत्यसंस्कारासाठी जागा हि मिळत नाही, असे सांगण्यात येत आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकांवर अंत्यसंस्कार करायला लाकडे हि शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जाताहेत. माझं मूळ गाव उत्तर भारतात आहे, तेथील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत.

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कोणत्याही व्यक्तीची कोरोना चाचणी होत नाही. त्याठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत. एवढंच काय, मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही शिल्लक राहिलेली नाहीत. अशी परिस्थिती असताना योगी सरकार टीव्हीवर जाहिराती करत आहे.

उत्तर प्रदेशामध्ये लोकांना रामराज्य आल्याचे स्वप्न दाखवण्यात आले मात्र, सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी योगी सरकारवर केली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला लाजिरवाणी घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडली असून यातून कोरोनाचं विदारक चित्र समोर आलं आहे. चौसा येथील महादेव घाटावर मृतदेहांचा खच पडला आहे.

उत्तर प्रदेशातील मृतदेह येथे आणले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कोरोना काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटावरची छायाचित्राने सगळेच हादरले आहेत. या मृतदेहांनी गंगेचा महादेव घाट भरला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर येता जिल्हा प्रशासनाचे हात वर केले आहेत.

नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रा राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात नाहीत. कोणालाही उपचारापासून वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. भाजपशासित राज्यात मात्र चित्र वेगळे आहे. महाराष्ट्राला बिल्लारीमधून येणारा ऑक्सिजन बंद केला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ऑक्सिजन गोव्याला देणे योग्य नाही.

हे सर्व महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यासाठी सुरुय. योगी सरकार म्हणते आम्ही फक्त स्थानिक लोकांना लस देणार आहे. केंद्र सरकार याबाबत काय विचार करत आहे?, देशात एकच पद्धत असली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.