TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 ऑगस्ट 2021 – मुंबई आणि पुण्याऐवजी राज्यांतील अन्य छोट्या शहारांत आयटी उद्योग प्रकल्प उभारल्यास त्यांना राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातील, अशी माहिती राज्याचे मंत्री सतेज पाटील यांनी दिलीय. मुंबईमध्ये इंडियन मर्चंट चेंबर्सच्या एका कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, नागपूर, अमरावती, लातूर, सातारा अशा शहरांत हे उद्योग उभारण्यास वाव आहे. पुणे, मुंबई आणि औरंगाबाद ही शहरे आता आयटी हब शहरे झालीत. या शहरांत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचाहीं लाभ या क्षेत्रातील कंपन्यांना झालाय.

आता यापुढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांत हे उद्योग विस्तारण्यासाठी संबंधित कंपन्यांना मोठ्या सवलती राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उद्योगांना छोट्या शहरांत वीज आणि अन्य पायाभूत सुविधा अधिक प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने लोकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी तंत्रज्ञावर आधारीत एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, असे नियोजन आहे.

आम्ही स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना रूग्णालये आणि क्‍लिनीक्‍सशी जोडणार आहोत. त्या आधारे काही मिनीटांत संबंधितांना आरोग्य विषयक मदत उपलब्ध होणार आहे.

आम्ही राज्यातील बारा हजार ग्रामपंचायती 25 जिल्हे आणि शहरे ऑप्टीकल फायबरने जोडलीत. त्याद्वारे महानेट आणि भारतनेट तर्फे तेथे वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ही सेवा वेगाने विस्तारण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य सरकारला सूचना केल्यास त्याचेही स्वागत केलं जाईल, असेही राज्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.