TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 ऑगस्ट 2021 – भारतात रेल्वेचा प्रवास हा स्वस्त व जलद मानला जातो. मात्र, अनेकदा रेल्वेगाड्या उशिराने धावतात तेव्हा ज्याचा फटका हा प्रवाशांना बसतो. आजपर्यंत या लेटलतिफी विरोधात प्रवासी बोलत नाहीत. मात्र, दोन प्रवाशांनी रेल्वे विभागाला कोर्टात खेचून दणका दिला आहे. रेल्वेगाडीला उशीर झाल्याने या प्रवाशाचं विमान सुटलं होतं. ज्यामुळे या प्रवाशाला आर्थिक मानसिक तसेच शारिरीक आणि मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रवाशांनी रेल्वेच्या विरोधात दाद मागितली होती, ज्यात त्यांना विजय मिळाला.

रमेश चंद्र आणि कांचन चंद्र हे प्रयागराज एक्सप्रेस रेल्वेने नवी दिल्लीला जात होते. ही ट्रेन 12 एप्रिल 2008 रोजी सकाळी 6.50 वाजता पोहोचणे अपेक्षित होतं. मात्र, ही ट्रेन 5 तास उशिराने म्हणजे 11.30 वाजता नवी दिल्ली स्थानकामध्ये पोहोचली होती. नवी दिल्लीला उतरून रमेश चंद्र आणि कांचन चंद्र यांना कोच्चीला जायचे होतं.

ट्रेन उशिरा आल्याने या दोघांचे कोच्चीला जाणारं विमान सुटलं. यामुळे हे दोघे संतापले. या दोघांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे रेल्वेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

या दोघांनी 19 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. ग्राहक मंचाने या दोघांची बाजू योग्य आहे, असे म्हणत रेल्वेला या दोघांना 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

या आदेशाला रेल्वे विभागाने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे आव्हान दिलं. तिथेही निकाल रेल्वे विभागाच्या विरोधात गेला होता. यानंतर रेल्वे विभागाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडेही दाद मागितली होती.

तिथेही निकाल विरोधामध्ये गेल्याने रेल्वे विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहक न्यायालयाने ग्राहक आयोगाचे आदेश योग्य ठरवत रेल्वे विभागाला अखेर दणका दिला. न्यायालयाने 4 आठवड्यांच्या आत 25 हजार रुपये कोर्ट रजिस्ट्रीमध्ये भरण्याचे आदेश दिलेत.