TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 जून 2021 – जम्मू- काश्मीरमधील विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने आता लडाखमधील पक्षांना चर्चेसाठी बोलावल्याचे वृत्त आहे. शनिवारी कारगिरमध्ये एक पत्रकार परिषद कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या वतीने आयोजित केली होती. 1 जुलै रोजी दिल्लीत केंद्र सरकारने ही बैठक बोलावली आहे, अशी माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये भाग घेणार नाहीत. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी चर्चा करणार आहेत. लडाखमधील विविध पक्षांना केंद्रीय गृह सचिवांनी फोन करुन या चर्चेचे निमंत्रण दिलं आहे.

पण, केंद्र सरकारच्या वतीने चर्चेची नेमकी तारीख जाहीर केली नाही. पण, ही चर्चा 1 जुलै रोजी होणार आहे, असे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने म्हटले आहे.

तेथील सर्वच राजकीय पक्षांनी जम्मू – काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा परत मिळावा, अशी मागणी केलीय. तशाच प्रकारे, लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी लडाखच्या नेत्यांनी केलीय.

1975 साली जर अडीच लाख लोकसंख्या असणाऱ्या सिक्कीमला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळत असेल तर, तसाच दर्जा लडाखला का मिळू नये? असा सवालही लडाखच्या नेत्यांनी केलाय. त्यामुळे या बैठकीत कलम 370, कलम 35 A आणि राज्याच्या दर्जावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली आहे.